Tuesday, March 31, 2009

Ajay Atul : My Fav Marathi Musicians

अजय - आज आपण दोघंही संगीतकारांची जोडी म्हणून लोकप्रिय झालो आहोत; पण एकेकाळी तुला अभिनयामध्ये आवड होती ना?
अतुल - आवड होती म्हणण्यापेक्षा मला माहीत होतं, की मला कोणत्या गोष्टीत गती आहे. एखाद्या गोष्टीत यश मिळालं, कोणी पाठ थोपटली, की मला त्या गोष्टीची प्रेरणा मिळायची. "सकाळ' वर्तमानपत्राच्या नाट्यवाचन स्पर्धेत "हिमशुरू' नावाच्या एकांकिकेचं मी वाचन केलं होतं. तेव्हा वृत्तपत्रात माझं नाव झळकलेलं पाहून मी कमालीचा खूश झालो होतो. त्यानंतर मला अभिनयाचं बक्षीसही मिळालं होतं. आपण अनेक गोष्टी कराव्यात, असं मला वाटायचं. अभिनय करावा असं वाटायचं आणि अजूनही वाटतं.

अजय - म्हणजे आता तू अभिनयही करणार आहेस की काय?
अतुल - अरे, अभिनयच काय; पण दिग्दर्शनही करायची माझी इच्छा आहे. पण संगीतकाराच्या कामातून वेळ मिळायला हवा ना!

अजय - मला आठवतंय, तुला शाळेत असताना गणित, भूगोल हे विषय आवडत नव्हते, बरोबर ना?
अतुल - अजिबातच आवडत नव्हते ते विषय मला. खारे वारे, मतलई वारे शिकून करायचंय काय असं मला वाटायचं. गणिताचा तर मला कंटाळाच यायचा. पण बॅंड पथकात तर मी कायम पुढे असायचो. मराठी कविता आणि इतिहास या गोष्टींची मला खूप आवड होती. मी रोज शाळेतली प्रार्थना म्हणायचो.

अजय - लहानपणी तू तर खूपच लुकडा होतास; मग तुला एनसीसीमध्ये घेतलंच कसं?
अतुल - त्याचं एकमेव कारण म्हणजे म्युझिक. माझा आवाज एकदम पहाडी होता. ऑडिशनला "हवासिंग' नावाचे एक मेजर आले होते. त्यांनी तर सर्वांची ऑडिशन घेतली आणि माझा पहाडी आवाज पाहून ते प्रचंड खूश झाले होते. अशा रीतीने माझी निवड झाली.

अजय - एनसीसीमध्ये गेल्यानंतर तुझ्या बारकुडेपणामुळे तुला काही गमतीदार अनुभव आले का?
अतुल - अरे, मी खूप बारीक असल्यानं माझ्या मापाचे बूटच मिळत नव्हते. पी.टी.च्या शूजवर मी परेड करायचो. शेवटी माझ्या मापाचा ड्रेस मी स्वतः शिवला होता. त्या पन्नास जणांच्या विद्यार्थी समूहात माझा ड्रेस वेगळा दिसायचा. पण माझ्या "डेडीकेशन' या प्लस पॉईंटमुळे आणि ऑर्डर देण्याच्या पद्धतीमुळे मला "सार्जंट'चं पद मिळालं आणि मी पूर्ण एनसीसीमय झालो.

अजय - दहावीचं वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातलं महत्त्वाचं वर्ष असतं आणि तू प्रिलीमला गणिताच्या पेपरात चक्क चित्रं काढली होतीस ना?
अतुल - गणित म्हटलं की माझा छत्तीसचा आकडा. ते आकडे बघून मला झोप यायची. प्रिलीमला गणिताच्या पेपरातलं मला काहीच येत नव्हतं. मी चित्रं काढून ठेवली पेपरात. आई पेपरचे मार्क विचारायची. तेव्हा मी खोटं सांगितलं, की मी पेपर संपूर्ण सोडवलाय; पण सरांनीच गुण दिले नाहीत. तेव्हा आई शाळेत आली. सरांनी तो चित्रमय गणिताचा पेपर आईला दाखवला. मग काय, घरी आल्यावर बेदम मार खावा लागला.

अजय - अतुल, हा जरा अतीच बेशिस्तपणा झाला. पण मग तुझ्या आयुष्याला शिस्त लागली की नाही?
अतुल - मी शाळेत व्रात्य होतो हे खरं आहे. पण मला शिस्त लावण्यात वाटा आहे तो एनसीसीचा. मी सार्जंट झालो, तेव्हा मला इतर मुलं "फॉलो' करणार याची जाणीव झाली आणि मग हळूहळू तो व्रात्यपणा कमी होत गेला.

अजय - तू आयुष्यात पतंग कधीच उडवला नाहीस; पण विमान उडवलं होतंस ना?
अतुल - आपल्या शाळेचा सुवर्णमहोत्सव होता, तेव्हाची गोष्ट आहे. त्यानिमित्तानं पॅरा-ग्लायडिंगच्या प्रात्यक्षिकांसाठी माझी निवड झाली होती. माझं पायलट होण्याचं स्वप्न होतं. त्या प्रात्यक्षिकांमुळे मिनी-पायलट होण्याचं माझं स्वप्न साकार झालं.

अजय - पण विमानाचं तुला अजूनही आकर्षण आहे ना?
अतुल - हो तर! पण आता ते आकर्षण मी संगणकाच्या माध्यमातून जपत असतो. विमानं मला कायमच आकर्षित करतात. संगणकावर "हाय सिमिलेटर' हा गेम मी तासन्‌ तास खेळत असतो.

अजय - आपण या इंडस्ट्रीत यायला नेमकं काय केलं, आठवतं?
अतुल - अजय, आपल्या वडिलांची सरकारी नोकरी असल्यामुळे बदल्या व्हायच्या. त्यामुळे शिरूर, राजगुरुनगर असा आपला प्रवास सुरू होता. मला आठवतंय, मी नववी-दहावीत असताना "पाहिजेत' या शीर्षकाखाली "कलाकार पाहिजेत' या आशयाच्या जाहिराती खूप यायच्या. मी तिथे जायचो; पण मग तिथे गेल्यावर लक्षात यायचं, की पेपरात दिलेले ते सर्व पत्ते खोटे असायचे. पुण्याला फिल्म इन्स्टिट्यूट कुठे आहे हे पाहायला आईनं मला त्याकाळी एकट्याला काही पैसे देऊन पाठवलं आणि जवळ जवळ दोन तास मी तो पत्ता शोधत बसलो होतो.

अजय - पण मग नेमकी करिअरची दिशा कशी सापडली?
अतुल - जेव्हा आपण पुण्यात आलो, तेव्हा तिथल्या स्थानिक ग्रुपबरोबर लोककलेच्या कार्यक्रमात वादक, गायक, नर्तक म्हणून सहभागी झालो. काही ना काहीतरी ऍक्‍टिव्हिटी अशा कार्यक्रमातून सुरू राहिली. मग ओळखी वाढल्या आणि संगीत क्षेत्र हे करिअरसाठी योग्य असल्याची जाणीव झाली.

अजय - आपल्या पहिल्यावहिल्या रेकॉर्डिंगबद्दल सांग.
अतुल - तेव्हा तर स्टुडिओ कसा असतो, हेडफोन्स का लावतात, रेकॉर्डिंग कसं होतं हेदेखील माहीत नव्हतं. बारा गाण्यांना आपण दोघांनी संगीत दिलं होतं. फक्त चार हजार रुपये बजेट होतं. स्टुडिओची रचना वगैरे या गोष्टीही नवीन होत्या. ते रेकॉर्डिंग झाल्यावर आपल्या दोघांच्याही डोळ्यांत पाणी आलं होतं.

अजय - आपण पहिला की-बोर्ड खरेदी केला, तेव्हाची आठवण लक्षात आहे का?
अतुल - आपल्याकडे तेव्हा कुठलंच स्वतःच्या मालकीचं वाद्य नव्हतं. की-बोर्डसुद्धा आम्ही भाड्यानं आणत होतो. शेवटी आपण ठरवलं होतं, की स्वतःचा की-बोर्ड खरेदी करूया. पण त्या की-बोर्डची किंमत होती, "एक लाख पाच हजार' रुपये. काही जणांकडून पैसे उसने घेतले, लोन काढलं. पहिल्यांदा आपण "एक लाख' रुपये प्रत्यक्षात बघितले होते. मुंबईला आपण सर्व तो की-बोर्ड खरेदी करायला गेलो होतो, हे कसं विसरू शकेन मी?
अजय - पण एक प्रश्‍न पडतोय, की आपल्याला परवडतं ते घेण्यापेक्षा जगातलं सर्वोत्तम जे, तेच खरेदी करावं, असं तुला का वाटतं?
अतुल - प्रवाहात जे चालू आहे, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं, असं मला वाटतं. सगळं दर्जाचंच असावं, हा माझा आग्रह असतो. कारण प्रगत तंत्रज्ञान खरेदी केलं की त्याचे फायदेही निश्‍चितच जास्त असतात. कुठल्याही गोष्टीतला "पायंडा' हा आपल्यापासून सुरू व्हावा, असं मला वाटतं. आपण चाकोरीबद्ध विचार करण्यापेक्षा चाकोरीबाहेरचा विचार करणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं.

अजय - तुझी मैत्री तुझ्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या माणसांशी पटकन्‌ कशी काय होते?
अतुल - ज्यांच्याकडून मला काही ना काही तरी चांगलं शिकायला मिळतं, अशांबरोबर मैत्री करायला मला आवडते. माझा स्वभाव एखाद्याशी पटकन्‌ मैत्री करणारा आहे. मला इतरांचे अनुभव, विचार ऐकायला आवडतात.

अजय - पुणे-मुंबई ए.सी. बसनं प्रवास करताना तिकीट खरेदी करूनही तू ड्रायव्हरच्या शेजारी का बसायचास?
अतुल - मला गाड्यांची खूप क्रेझ आहे, ड्रायव्हिंगची क्रेझ आहे. मला ड्रायव्हिंग उत्तम येऊ शकतं, याची जाणीव मला कधीच झाली होती. पुणे-मुंबई प्रवासात माझी ड्रायव्हरशी पटकन दोस्ती होऊन जायची. गाड्यांचं मला खूप आकर्षण आहे. माझ्या आयुष्यातील "टॉप फाइव्ह' गोष्टीत कार्सना एक स्थान आहेच.

अजय - तुला वाचनाची आवड कशी लागली?
अतुल - याचं सर्व श्रेय आपल्या आईला आहे. वाचनाची सवय मला आईनंच लावली. लायब्ररीतून माझ्याकरिता ती छान-छान पुस्तकं घेऊन यायची. बसल्या-बसल्या ज्ञानाचा प्रचंड खजिना देतात ती ही पुस्तकं! आजही प्रवास करताना चार-पाच पुस्तकं मी जवळ ठेवतोच.

अजय - तुझे आवडते लेखक?
अतुल - पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार, गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे आणि विश्‍वास पाटील.

अजय - विश्‍वास पाटील यांच्याबरोबर तू रायगडावर गेला होतास ना?
अतुल - तो अनुभव तर अविस्मरणीयच आहे. आपण महाडला एका हॉटेलात उतरलो होतो. विश्‍वास पाटील पहाटे आपल्याला उठवायला आले आणि म्हणाले, "काय, रायगड चढायचाय ना?' मनात प्रचंड उत्साह संचारला होता. रायगडच्या पायथ्यापासून ते वरपर्यंत जाताना विश्‍वास पाटील प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या आठवणी जागृत करीत होते. रायगडाबद्दल शाळेत जे वाचलं होतं, ते आठवलं. लहानपणी रायगड पहिला होता ते आठवलं आणि आता सर्व इतिहास जागृत झाल्यासारखं वाटलं आणि गडावर पोचल्यावर तर काय, राज ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या "ई टीव्ही'साठी चित्रीत होणाऱ्या सुसंवादातून आनंददायी पर्वणीच अनुभवली होती.

अजय - अजय-अतुल हे नाव भविष्यात कुठे असावं, असं तुला वाटतं?
अतुल - आपण सतराशे साठ गोष्टी करण्यापेक्षा तेवढ्याच गोष्टी करूया की ज्या त्या क्षेत्रातील "माइल स्टोन' ठरतील. पाचशे चित्रपटांना संगीत द्यायचं आणि त्यातले पन्नासच लोकांनी लक्षात ठेवायचे, अशी आपली ओळख कधीच नसावी. त्यापेक्षा भलेही आपण पन्नासच चित्रपट करू; पण तो प्रत्येक चित्रपट लोकांच्या लक्षात राहणारा ठरेल. फक्त संगीतच नव्हे; तर ज्या-ज्या क्षेत्रात आपण जी जी कामगिरी करू, ती लोकांच्या कायम स्मरणात राहायला हवी.

अतुल - अजय, लहानपणी तू स्वतःला अंडर-एस्टीमेट का करायचास?
अजय - मी पटकन्‌ खूप गप्पा मारत नाही. लहानपणी माझ्यात आत्मविश्‍वासाचा थोडा अभाव होता. अमुक एक गोष्ट मला जमेल का, "हे नको रे, ते नको रे' असा माझा ऍटिट्यूड होता. शिवाय मी धाकटा असल्यानं मला ओरडा खायला लागायचा. मग मी शांतच होत गेलो.

अतुल - शांत होत गेलास की स्वतःला शोधत बसला होतास?
अजय - मी खरं तर त्या वेळी "बंद'च पडलो होतो, असं म्हण. कारण "शोधणे' ही एक प्रक्रिया आहे. ती सुरू व्हायला एक "कीक' लागते. स्वतःला सापडण्याचा एक दिव्य क्षण असतो. तो क्षण यायला नेमकी वेळ यावी लागते.

अतुल - तुझ्या आयुष्यातला तो क्षण नेमका आला कधी?
अजय - तो क्षण मी शोधू शकलो तो म्युझिकमुळेच. संगीतकलेनंच मला योग्य तो आधार दिला. पुण्याला आल्यावर तो सूर खऱ्या अर्थानं सापडला. मग संधी मिळत गेली. माझ्यातला "मी' मला सापडला. मग मागे वळून कधी पाहावंच लागलं नाही.

अतुल - तुझ्या जिवावर बेतलेल्या प्रसंगातून आयुष्याकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन कसा बदलला?
अजय - असं तीन वेळा घडलंय. मी अगदी तान्हं बाळ असताना खूप आजारी होतो तेव्हाही मी वाचलो. त्यानंतर मला एकदा आईनं कडेवर घेतलं होतं आणि एका गाईनं धक्का मारल्यामुळे मी खाली पडलो. मला खूप मार लागला होता; पण मी बचावलो. त्यानंतर एकदा गाडीतून प्रवास करताना मी खाली उतरलो. समोरून ट्रक आला. आमच्या गाडीला धडक दिली. त्या अपघातात माझ्या डोळ्यादेखत आपला चुलतभाऊ मरण पावला. एवढ्या भीषण अपघातात मी अगोदर खाली उतरल्यामुळे वाचलो. माझा देवावर प्रचंड विश्‍वास आहे. मी वाचलो म्हणजे माझ्या हातून भविष्यात काहीतरी निश्‍चित चांगलंच घडणार आहे, असा ठाम विश्‍वास माझ्या मनात निर्माण झाला आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीतूनच बघायचं, हा विचार आला.

अतुल - तुला आलेल्या पहिल्या प्रेमपत्रामुळे तुझी चांगलीच फजिती झाली होती ना रे?
अजय - तेव्हा आपण "खेड'मध्ये राहत होतो. मी दहावीत होतो. त्या काळात "खेड'सारख्या एका गावात मुलगा आणि मुलगी बोलतात, हेदेखील "फार' होतं. सातवीतली एक मुलगी काहीतरी निमित्त काढून आपल्या घरी येऊ लागली होती. ती घरी आली की मी मात्र निमूटपणे निघून जात होतो. एकदा तर त्या मुलीनं धाडस केलं. दहावीचं "बेस्ट ऑफ लक' देण्याच्या निमित्तानं ती आपल्या घरी आली आणि तिने चक्क गुलाबाचं फूल आणि एक पत्र माझ्या हातात दिलं. ते आईनं बघितलं. मी ते पत्र न वाचताच आईकडे सुपूर्द केलं. पण या प्रकरणात माझी काहीही चूक नव्हती. त्यामुळे आई मला ओरडली नाही. त्या मुलीचं आपल्याकडे येणं मात्र बंद झालं.

अतुल - मी तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असल्याने शाळेत असताना तुला या गोष्टीचा फायदा झाला की तोटा-
अजय - थोडा तोटा आणि जास्त फायदा. कारण तू शाळेत व्रात्य असल्यामुळे "गोगावले अतुल'चा भाऊ ना, म्हणजे तो व्रात्यच असणार, अशी सुरुवातीला माझी इमेज झाली होती. पण मी व्रात्यपणा करीत नाही, हे लवकरच सर्वांना जाणवलं. तुला असणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आवडीमुळे मलाही कलेची आवड असणार, हेदेखील गृहीत धरलं गेलं आणि मला तो फायदाच झाला. तू एनसीसी सार्जंट होतास, मी वर्गातला मॉनिटर होतो. मलाही एनसीसीमध्ये थेट प्रवेश मिळाला. सकाळची प्रार्थना मी म्हणायचो. तू एनसीसीचं ड्रील मला घरी आधीच शिकवलंस. हे सगळे तुझ्या "दादा' असण्याचे मला झालेले फायदे आहेत.

अतुल - आपण करिअरसाठी जेव्हा मुंबईला अप-डाऊन करू लागलो होतो, तेव्हा आई-बाबांच्या पाया पडताना तू का रडायचास?
अजय - अतुल, तू जसा बिनधास्त होतास ना, तसा मी नव्हतो. शिवाय आई-वडिलांना सोडून मी एकदा दूर असा राहिलोही नव्हतो. मी खूप इमोशनल आहे. मुंबई हे मोठं शहर, आपण आधी खेडेगावातून तिथं जाणार, अशा संमिश्र भावनांमुळे; तसंच मुंबईत करिअरची संधी मिळणार, याच्या आनंदानंही डोळे भरून यायचे माझे!
अतुल - घरच्यांना न सांगता तू नदीवर पोहायला कसा शिकलास?
अजय - मी पोहायला शिकावं अशी माझ्या मित्राची इच्छा होती. गावात नदीवर कंबरेला डबा बांधून माझ्या मित्रानं मला पोहायला शिकवलं. आपण बुडणार नाही, याची खात्री झाल्यावर मला पोहणं जमू लागलं. घरी न सांगता मी गुपचूपपणे नदीवर पोहायला जाऊ लागलो. मी तुझ्या मदतीशिवाय केलेली आणि लहानपणी शिकलेली गोष्ट म्हणजे "पोहणे'.

अतुल - तू कोरसमध्ये गातोस, तेव्हा तुला काय वाटतं?
अजय - मी कोरसमध्ये गातो, याची मला अजिबात लाज वाटत नाही. पुण्यात आपण असतानाही मी कोरस गायचो. आज आपण संगीतबद्ध केलेल्या "कोरस'मध्येही मी गातोच! "झील' नावाचा जो प्रकार आहे, तो मी शिकलो ते त्या काळात कुणाची तरी कॉपी केल्यामुळेच.

अतुल - इतर संगीत-दिग्दर्शक तुला जेव्हा "गायक' म्हणून बोलावतात, तेव्हा कसं वाटतं?
अजय - चांगलंच वाटतं. एक संगीतकार जेव्हा दुसऱ्या संगीतकाराला "गायक' म्हणून बोलावतो, तेव्हा त्या संगीतकाराबद्दल मला खूपच आदर वाटतो. मी जे गाऊ शकतो, ते मी संगीतकार असल्यामुळेच. एका संगीतकाराला एखाद्या गायकाकडून नेमकं काय हवं असतं, हे मी जाणू शकतो, ते मी एक संगीतकार असल्यामुळेच. मला "संगीतकार' म्हणून जे कळतं, ते देण्याचा, ते त्या संगीतकाराच्या भावना काय आहेत ते जाणून घेऊन त्या पद्धतीनं गाण्याच्या माध्यमातून मी व्यक्त करतो.

अतुल - तू की-बोर्ड वाजवायला कसा शिकलास?
अजय - मला बासरी, माऊथ ऑर्गन ही वाद्यं येत होती. पण मी पेटी फारशी वाजवली नव्हती. वाद्य वाजवणं हे एक तंत्र आहे. पण ते वाजवताना "भावना' जास्त महत्त्वाच्या आहेत, असं मी मानतो. त्या भावनांच्या प्रवाहातच मला सूर सापडले आणि मला "की-बोर्ड' येऊ लागला. भावनांचा जसा अंत नाही, तसाच वाद्यांद्वारे निर्माण करणाऱ्या नवीन प्रयोगांना, सुधारणांनाही अंत नाही.

अतुल - एखाद्या अनोळखी माणसाबरोबर तू मनापासून काम करू शकत नाहीस ना?
अजय - "अनोळखी' असं म्हणण्यापेक्षा मी जोपर्यंत एखाद्याला "मित्र' म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत मी त्या व्यक्तीचं काम नाही करू शकत. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीशी एक "माणूस' म्हणून माझे सूर जुळत नाहीत, तोपर्यंत मी काम करू शकत नाही. संगीत ही कला आहे. "अमुक एक करावं' अशी ऑर्डर तुम्ही या कलेत देऊ शकत नाही. तिथे ट्युनिंग जमणं हे महत्त्वाचं आहे.

अतुल - तुला घरचं खाणं कमी आणि बाहेरचे खाद्यपदार्थ जास्त आवडतात, त्याविषयी सांग.
अजय - एकंदरीतच खाद्यसंस्कृतीशी माझं जवळचं नातं आहे. पण त्यातही वरणभात, पोळीभाजी अशा टिपीकल जेवणापेक्षा वडापाव, मिसळ, समोसा, पोहे या गोष्टी मला जास्त आवडतात. मुंबई-पुण्यातच काय; पण ठिकठिकाणची अप्रतिम खाद्यपदार्थ देणारी हॉटेल्स, धाबे, टपऱ्या मी शोधून काढल्यात.

अतुल - तुझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण...
अजय - माझ्या मुलाचा जन्म आणि "इलाय राजा'ची भेट.

अतुल - माझ्या स्वभावातील कोणती गोष्ट तुला आवडत नाही?
अजय - तू जेव्हा एखाद्या गोष्टीवरून पटकन्‌ चिडतोस तेव्हा...

अतुल - तुझ्या आयुष्यावर प्रभाव पाडणारे दुसरे संगीतकार कोण?
अजय - लक्ष्मीकांत प्यारेलाल, मदन मोहन, शंकर-जयकिशन, सलील चौधरी, आर. डी. बर्मन, बप्पी लाहिरी, पं. हृदयनाथ मंगेशकर, राम कदम, विश्‍वनाथ मोरे, राम-लक्ष्मण, जॉन विल्यम्स, जॅरी गोल्डस्मिथ, बिथोन, मोझार्ट, सॅम्युअल बार्बर हे सगळेच माझं आदराचं स्थान आहेत आणि सर्वात महत्त्वाचं नाव इलाई राजा!

अतुल - पण इलाई राजाच का?
अजय - इलाई राजा हे माझ्यासाठी द्रोणाचार्य आहेत. ही व्यक्ती म्हणजे एक चमत्कार आहे. संगीत ही फक्त नृत्याकरिता केलेली व्यवस्था नसून ती एक दैवी देणगी आहे आणि नुसती दैवी देणगी नव्हे; तर मनाला डोलवणारी दैवी देणगी. हे मला समजलं ते "इलाई राजा' या व्यक्तिमत्त्वामुळे. संगीतकलेकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन अंतर्बाह्य बदलला तो त्यांच्यामुळेच!
अतुल - पुढच्या आयुष्यातील तुझं ध्येय....
अजय - मराठी संगीत संपूर्ण जगात पोहोचवायचं आहे. आज मराठी माणूस जसा पाश्‍चात्य गाण्यांचा आनंद घेतो, तसं ज्यांना मराठी भाषा येत नाही, त्यांनीदेखील मराठी संगीताचा आनंद घ्यावा, अशा पद्धतीनं मला संगीतकलेला जगभरात पोहोचवायचं आहे. पाश्‍चात्यांनाही मराठी गाणी आवडतील, त्यासाठी काम करायचं आहे.

अतुल - माणूस म्हणून पुढचा जन्म मिळाला तर कोण व्हायला आवडेल?
अजय - संगीतकलेचं रीतसर प्रशिक्षण घेतलेला संगीतकार आणि संगीतकारच!

अतुल - या क्षेत्रात येणाऱ्या नवीन संगीतकारांना काय सांगशील?
अजय - गायकांच्या बाबतीत कधीकधी असं होतं, की ते गायक एखाद्या विशिष्ट गायकीत, गाण्याच्या प्रकारात अडकून जातात. संगीतकारानं असं एखाद्या विशिष्ट पद्धतीत कधीच अडकू नये. केवळ एकाच पद्धतीच्या चाली देऊन संगीतकार होऊ शकत नाही. संगीतकाराला सर्व भावना, घटना समजायला हव्यात. त्यानुसार विविध पद्धतीचा बाज त्यांनी वापरायला हवा. तो "व्हर्सटाइल' असावा. संगीतकार जर संगीत-संयोजक असेल तर उत्तमच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं संगीत दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तुम्ही तुमच्या नजरेतून त्याला योग्य रंगरूप देऊन सजवणं आणि लोकांच्या मनापर्यंत पोहोचविणं आवश्‍यक आहे.

[Source : esakal]